खंडोबाचीवाडी, कुंडलचा राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक | लवकरच दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येक एक कोटी रुपयांचे बक्षीस
जनता न्यूज - भिलवडी | दि.८/४/२०२३
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२३ दीनदयाल उपाध्याय पंचायत सतत विकास या पुरस्काराची घोषणा शुक्रवारी केंद्र शासनाकडून करण्यात आली. या पुरस्कारासाठी राज्यातील तीन गावांची निवड झाली आहे. यामध्ये पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी आणि कुंडल हे देशात प्रथम आले आहे. राष्ट्रपती यांच्याहस्ते दिल्लीत दि. १७ रोजी प्रत्येक एक कोटी रुपये देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
कुंडल, खंडोबाचीबाडीने दोन योजनेत देशात प्रथम क्रमांक पटकविला आहे. जिल्ह्याच्यादृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे.यामध्ये स्थानिक अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे योगदान आहे.
- जितेंद्र डुडी सीईओ, जि. प. सांगली
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२३ दीनदयाल उपाध्याय पंचायत सतत विकास या पुरस्कारासाठी जिल्ह्यात विबिध उपक्रम राबविण्यात आले होते. निकषानुसार गावाची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातून ६ गावांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. या पुरस्काराची शुक्रवारी केंद्र शासनाकडून घोषणा झाली.
त्यामध्ये राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक आणि सांगली जिल्ह्यातील दोन अशा तीन गावांची निवड झाली आहि. पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडीला 'गरिबी मुक्ती आणि राहणीमान उंचावलेले पंचायत' या योजनेत देशात प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. तसेच याच तालुक्यातील कुंडलने स्वच्छ आणि हरीत ग्रामपंचायत अभियानात' देशात पहिला क्रमांक पटकविला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येक एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. सोमवार, दि. १७ रोजी राष्ट्रपती यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी यांना बोलविण्यात आले आहे. या पुरस्कारातून मिळणाऱ्या निधीतून गावातील अनेक विकास कामांना गती येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.


